भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरने दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. मात्र सुदैवाने म्हात्रे यांनी गोळ्या चुकवल्याने त्यांना एकही गोळी लागली नसून ते थोडक्यात बचावले आहेत.
दीपक म्हात्रे हे पत्नीसह वैयक्तिक कामासाठी ठाणे इथे गेले होते. ठाण्यातून घरी आल्यानंतर त्यांनी घरासमोरील परिसरात आपली गाडी पार्क केली. तेव्हाच अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र दीपक म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सदर घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आह. मात्र पोलिसांच्या तपासानंतर सर्व प्रकार समोर येणार आहे.
भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाद, प्रतिवाद सुरु झाले आहेत. गुंदवली गावातही नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारीवरून वाद झाल्याने चौघांवर रॉड, चॉपरने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४ जण गंभीर जखमी झाले. तसेच एका आरोपीकडे रिव्हॉल्व्हरही आढळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page