कणकवली /-

कणकवली शहरात बाणे किराणा दुकानाला आग लागली त्यावेळी अग्निशमन बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला, त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कणकवली येथील नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते, यावेळी उपनगराध्यक्ष बंधू हर्णे, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, संदीप नलावडे, किशोर राणे उपस्थित होते.

श्री. नलावडे पुढे म्हणाले, दिलीप बिल्डकॉन चा पाण्याचा टँकर घटनास्थळी मीच बोलावून घेतला होता. टँकर यायला उशीर झाल्याने वाटेत टँकर थांबून बंबामध्ये पाणी भरून घेतले. मात्र, या साऱ्या प्रकारात बंब घटनास्थळी पोचायला उशीर झाल्यामुळे दुकानदार बाणे यांचे नुकसान झाले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, त्यानंतर बंबामुळेच सदरची आग आटोक्यात आणली या घटनेवेळी कणकवलीतील नागरिक नगरसेवक यांनी जी मदत केली, त्यांचे मी नगराध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो.

याप्रकरणी सबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे असा प्रकार पुन्हा घडू नये, म्हणून अग्निशमन बंबाच्या व्यवस्थेकडे मी व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे हे जातीनिशी लक्ष देणार आहोत. या घटनेनंतर सदर अग्निशमन बंबाच्या दैनंदिन कामकाजाचे रजिस्टर ठेवण्यात आले आहे. यावेळी नियमित डिझेल, पाणी व बंबाचा मेंटेनन्स चेक केला जाईल. या घटनेत कुणीही राजकारण करू नये. ज्यांचे नुकसान झाले, त्यांना आपण सर्वांनी एकत्र येत धीर देण्याची गरज आहे. घटना घडली त्यावेळी मी पुणे येथे असल्याने माझे नगरसेवक व नागरिक यांनी सहकार्यासाठी धाव घेतली. परंतु जी चूक होती, ती चूक आम्ही मान्य केली असून, येत्या दोन दिवसात संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल, असे श्री. नलावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page