पुणे /-

पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या वकिलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून 1 ऑक्टोबरला उमेश मोरे हे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी उमेश यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकांची नेमणूक केली होती. त्यानंतर या पथकाकडून उमेश यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे त्यांच्याबाबत विचारपूस करण्यात आली. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेजही तपासण्यात आले. मात्र उमेश यांचा काहीही पत्ता लागला नाही.

पुण्यातील घाट परिसरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह उमेश मोरे यांचा असल्याचं निष्पन्न झालं.

यानंतर पोलिसांनी माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे. कपिल फलके, दीपक वांडेकर, रोहित शेंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्यावर्षी एसीबीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात केलेल्या करवाईमध्ये उमेश मोरे फिर्यादी होते. त्यामुळे या खुनाचा त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page