महिलेला शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ रक्तगट “B” निगेटिव्हची होती गरज..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे केळूस कालवीबंदर येथिल महिला सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर (वय ४७) या महिलेला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची ६ बाॅटल रक्ताची गरज होती.पेशंट श्रध्दा ताम्हणकर यांचा रक्तगट “B” निगेटिव्ह म्हणजेच दुर्मिळ रक्तगट असल्याने आणि त्यातच ६ रक्तदाते शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असल्याने नातेवाईक चिंतेत होते.अशातचं सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी तातडीने ओरोस सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतून २ रक्तपिशव्या उपलब्ध करून दिल्या.दोन मिळाल्या परंतू अजूनही ४ बाॅटल रक्तांची गरज होती.अशातचं सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश राऊळ यांनीही तातडीने रक्ताची गरज असल्याशी पोस्ट तयार करून आपल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ग्रुपवर पोस्ट केली.त्यानंतर ती पोस्ट सर्वच सोशल मीडियावर सर्वानी व्हायरल केली.तर सर्वजण त्या महिलेला रक्त.मिळावे यासाठी कामाला लागले.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचेही पदाधिकारी व कार्यकर्तेही तातडीने कामाला लागले.तर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर व उपाध्यक्ष महेश राऊळ यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या सदस्यांमार्फत रक्तदात्यांना कॉल करून तात्काळ रक्तदाते उपलब्ध करून दिले.तर पत्रकार आबा खवणेकर यांनीही यावेळी मोठी मेहनत घेतली.या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदाते श्री अवधूत सामंत (दाभोली, वेंगुर्ला), श्री गुणाजी परब(रानबांबुळी, सिंधुदुर्ग), श्री सहदेव सावंत (परुळे,वेंगुर्ला), बाबूराव मुळीक (सावंतवाडी) यांनी तत्परता दाखवत सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी येथे तात्काळ रक्तदान केले.त्यांच्या या तत्परतेमुळे वेळेवर रक्त उपलब्ध झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्तदात्यांचे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले आहे.तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे मालवण सदस्य श्री आनंद वाईरकर हे रक्तदान करण्यास रक्तपेढी येथे गेले होते.मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही. या केसच्या पूर्ततेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ,वेंगुर्ला कार्यकारणी सदस्य बाळकृष्ण राऊळ, सावंतवाडी सचिव बाबली गवंडे,जिल्हा सहखजिनदार अमेय मडव, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अॅलिस्टर ब्रिटो आणि वेंगुर्ला खजिनदार भूषण मांजरेकर, दीपक राऊळ(कोचरा) प्रशांत जाधव(कुडाळ), सायली आचरेकर(आचरा), स्वाती राणे(कणकवली) तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोठे प्रयत्न केले.तर केळूस कालवीबंदर येथिल कृष्णा रेवणकर,पत्रकार आबा खवणेकर,वासुदेव ताम्हणकर,महेश नागवेकर यांनीही प्रयत्न केले आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही जिल्ह्यातील एकमेव नोंदणीकृत रक्तसंघटना असून गेल्या ३ वर्षात सिंधुदुर्ग जिल्हात ३०० पेक्षा अधिक रक्तदान शिबीरे राबवून ४५०० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन केले आहे. त्याचबरोबर संस्थेने आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक ऑन कॉल रक्तदाते पाठवून कित्येक जणांचे प्राण वाचवले आहे. केवळ रक्तदानच नव्हे तर प्लेटलेटदान, प्लाझ्मादान साठी रक्तदाते पाठवून बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचविले आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा सोबतच गोवा, मुंबई, पुणे, बेळगाव, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही कार्यरत आहे. संस्थेने १४ थॅलेसेमिया बालकांचे रक्ताच्याबाबतीतील पालकत्व घेतले असून त्यांना कुठेही रक्ताची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाते. सदर बालकांना दर १५-१८ दिवसांनी रक्त चढवावे लागते. तसेच अतिदुर्मिळ बॉम्बे ब्लडग्रुप जो दहा लाख व्यक्तींमध्ये फक्त ४ जणांमध्ये आढळतो अशा बॉम्बे रक्तगटाची शोधमोहीम राबवून जिल्ह्यातील १७ बॉम्बे रक्तगटाच्या व्यक्तींची नोंद झाली असून संस्थेकडे त्यातील ४ रक्तदाते आहेत. संस्थेला आणि सदस्यांना या रक्तदान क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रक्तदान क्षेत्रासोबतच देहदान,अवयवदान आणि रुग्णमित्र या क्षेत्रात संस्था कार्यरत आहे.
