✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर असल्याच्या रागापोटीच महाविकास आघाडीची एकजूट चाललेली आहे, या एकजुटीचं लवकरच भांड फुटणार असल्याचं भाकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय.

दरम्यान,काल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाच्या नेत्यांनी दांडी मारली.याउलट राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अवमानाप्रकरणी आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटाकडून देण्यात आलंय. त्यावरुन आता महाविकास आघाडीच्या एकजूटीचं हे भांड फुटणार असल्याचं आमदार पाटील म्हणाले आहेत.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ठाकरे गट आव आणत आहेत. उद्धव ठाकरेंनी कितीही आवाहन केलं तरी काँग्रेस त्यांचा देशपातळीवरचा विचार सोडणार नाही. फक्त याच नाहीतर इतर मुद्द्यांवरही उद्धव ठाकरेंची ससेपालट होणार असल्याचं त्यांनी म्हटलयं.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वेगळा आहे.बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेना उभी केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा होत असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे कारण उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणात माणसं पाठवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभांना कितीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल पण ही गर्दी आगामी निवडणुकांमध्ये मताच्या स्वरुपात रुपांतर होणार नसल्याचा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. निवडणुकीसाठी पक्षाला मजबूत अजेंडा लागतो,तो त्यांच्याकडे नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page