कुडाळ /-
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गेली दोन वर्ष सर्वच व्यवसाय ठप्प होते.यात पुरेसा व्यापार नसताना जास्तीत जास्त व्यापारांनी महावितरणाला सहकार्य करून आपली लाईट बिले भरणा केली आहेत. या कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची लाईट बिलामध्ये सवलत किंवा कर्जावरील सवलत व्यापारांना जाहिरझाली नाही. असे असताना देखील आपला व्यापार चालू ठेवण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी शक्य होईल त्याप्रकारे वित्त उभारणी करून व्यावसायची देणी वेळेवर भागविली आहेत.व्यापार हा अर्थ व्यवस्थेचा कणा आहे व तो खंबीर पणे उभा ठेवण्यासाठी सरकारी दरबारी अनुदान व सहकार्य अपेक्षीत असते.परंतु सद्या सुरू असलेला महावितरणाचा अंदाधुद कारभार पाहता अशा परिस्थीतीत व्यवसाय कसा चालवावा हा स्थानिक व्यापारां भेडसावणारा एक ज्वलंत प्रश्नच आहे.
सद्या महावितरणामार्फत मार्च अखेरचे कारण दाखवून एका महिन्याचे न भरणा केलेले विज बिल आढळून आल्यास त्यांच्या ‘वसुली व विज तोडणी करू’ अशा प्रकारची अरेरावी कुडाळ शहरामध्ये केली जात आहे. ज्या व्यापाऱ्यांनी मागील सर्व लाईट बिले वेळेत भरणा केली आहेत. परंतु नजर चुकिने फेब्रुवारी २०२२ या एका महिन्याचे एखादा बिल भरायचे राहून गेल्यास त्याच्याबाबत केली जाणारी अरेरावी व त्यांना दिली जाणारी वागणूक याचा आपण शासन म्हणून विचार करावा व योग्य ती कारवाई करावी. काही कामा निमित्त बाहेर गांवी गेलेल्या लोकांचा विजपुरवठा एका महिन्याचे बिल भरायचे राहिल्यामुळे अनेकवेळा खंडीत केला आहे.तसेच वेळेवर बिल भरून देखील विज तोडणी आढळून आली आहे.अनेक वेळा बँकांचे हप्ते देखील वेळेवर भरायचे राहून जातात. परंतु एका हप्त्यामुळे दुसऱ्या महिन्यात बँकेचे अधिकारी वसुलीकरताना आढळून येत नाहीत.मात्र सावकारी कर्जदेणाऱ्या संघटना अशा प्रकारची कारवाई करताना आढळून येतात.महावितरणाची सद्याची कार्यप्रणाली ही काहीशी सावकारी संघटनांप्रमाणे जाणवत आहे.महावितरण कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराविरोधात कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत आज मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट उपाध्यक्ष गोविंद सावंत सेक्रेटरी भूषण मटकर खजिनदार नितेश महाडेश्वर, प्रसाद शिरसाट,द्वारकानाथ घुर्ये,महेश ओटवणेकर इत्यादी उपस्थित होते.