सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यात सध्या घराघरात सर्दी-ताप-खोकला सदृश्य परिस्थिती ही वातावरणातील बदलांमुळे नैसर्गिकरित्या झालेली आहे. मात्र प्रशासन त्याकडे फक्त कोरोनाचा चष्मा लावून बघत आहे असे चित्र आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांकडून येणारी स्टेटमेंट व टेलिव्हजन न्यूज चॅनेल मधील बातम्या ह्या जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत असून त्यामुळे जनता भयभीत होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे तिसऱ्या लाटेचे आगमन झाल्याचे प्रशासन सांगत आहे; मात्र दुसरीकडे त्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. ह्या परिस्थितीत जिल्ह्यातील जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्या माध्यमातून तात्काळ साथीच्या आजारांवर उपयोगी औषध उपचार पुरवठा करणे प्रशासनाकडून अभिप्रेत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी “जनतेने हे करावं-ते करावं” असं मार्गदर्शन करण्याबरोबरच जिल्हा प्रशासन साथरोगांवर नियंत्रण आणण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करत आहे, तज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करत आरोग्य यंत्रणेत कोणत्या सुधारणा करत आहे याचा प्रथम जाहीर खुलासा करावा. या आपत्तीच्या काळात वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील जिल्ह्याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर उपलब्ध होऊ शकला नाही ही नामुष्की जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनुभवी डॉक्टरच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात जवळपास तेराशेपेक्षा अधिक मृत्यूची नोंद झाली याची जबाबदारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी घेणार का? त्यामुळे जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा आवश्यक उपाययोजनांना बळकट करण्यासाठी प्रयत्न जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत.तसेच जनतेने देखील भयभीत होऊन न जाता शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून मास्कचा वापर जास्तीत जास्त करावा.सततचा ताप व खोकला याचा अधिक त्रास जाणवल्यास आरोग्य सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन मनसेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page