कणकवली /-
अखेर भरणी वासीयांच्या मागणीला यश आले असून भरणी गावात रेशन दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबली आहे. गावात रेशन दुकान सुरू व्हावे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरवठा केला होता. त्यांच्या पाठपुरव्याला यश आले आहे. गावात रेशन दुकान सुरू झाल्याबद्दल तहसीलदार आर. जे. पवार व व पुरवठा विभागाच्या अधिकार्यांची ग्रामस्थ व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
भरणी गावात रेशन दुकान नसल्यामुळे येथील रेशनकार्ड धारकांना देवगड तालुक्यातील शिरगाव व काही महिने तरंदळे येथील रेशन दुकानात जावून धान्य घ्यावे लागत होते. त्यामुळे विनाकारण कार्ड धारकांना नाहक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत होता. भरणी गावात रेशन दुकान सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांनी अनेक वर्षे मागणी होती. ग्रामस्थांनी शिवसेनेच्या माध्यमातून तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरवठा केला. ग्रामस्थांची ही गरज लक्षात घेऊन त्यांनी रेशन दुकान सुरू करण्यात परवानगी दिल्याने गावात रेशन दुकान सुरू झाले आहे. गावात रेशन दुकान सुरू झाल्याबद्दल तहसीलदार आर. जे. पवार यांची ग्रामस्थ व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन आर. जे. पवार, श्री. जाधव, श्रीमती तांबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत-पटेल, नगरसेवक कन्हैया पारकर, बिडवाडी सरपंच सुदाम तेली, निसार शेख, विश्वनाथ दळवी, सुरेश साटम, प्रवीण जगताप, रोशन गुरव, प्रकाश गुरव, रमेश जगताप, रामचंद्र राणे, भिकाजी गुरव, अनिल बागवे यांच्यासह भरणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. केशरी कार्डधारक व अल्पउत्पन्न असलेले लाभार्थी ज्यांना अजून रेशन मिळत नाही. त्यांना रेशन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली. यावर दिलेल्या इष्टांकामध्ये जी लोकं बसतील त्यांना तात्काळ रेशन दिले जाईल व उर्वरित लोकांसाठी वाढीव इष्टांकाची मागणी करून त्यांनाही रेशन देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.