कुडाळ येथे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दमदार स्वागत कार्यकर्त्यांनी कुडाळात केले जोरदार शक्तीप्रदर्शन..
तर शिवसेना नेते अतुल बंगे व तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हातात झेंडे घेऊन नारायण राणेंच्या विरोधात दिल्या जोरदार घोषणाबाजी..
कुडाळ /-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणेंनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.राज्यात सध्या नारायण राणे विरुद्ध शिवसेना असं राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राणेंनीही आपली गाडी काही वेळ तिथेच थांबवली आणि घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर नजर रोखली!
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल होण्यापूर्वीत मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी इशारा दिला होता. राणेंनी वैयक्तिक टीका केली तर जशास तसं उत्तर मिळेल असं वैभव नाईक म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राणेंची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये दाखल झाली. त्यावेळी शिवसेना कार्यालयासमोर राणेंचा ताफा पोहोचला असता उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली.यावेळी शिवसैनिकांच्या हातात भगवे झेंडे होते. ही घोषणाबाजी पाहून राणेंनीही आपली गाडी काही वेळ थांबवली आणि शिवसैनिकांवर नजर रोखली. त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत राणेंचा ताफा पुढे नेला.
‘गाडी उभी केल्यावर जो तो मागे पुढे मागे पुढे जायला लागला’दरम्यान, या प्रकारानंतर बोलत असताना राणेंना शिवसेनेला जोरदार टोले लगावले. आमदार काय करतात तर धमकी देतात की जनआशीर्वाद यात्रा आम्ही येऊ देणार नाही. रस्त्यानं येत होतो तेव्हा गाडीच्या मागे लपत होते. मी मुद्दाम गाजी उभी केली. गाडी उभी केल्यावर जो तो मागे पुढे मागे पुढे जायला लागला. शेवटी पोलीस आले. त्यांनी गाडी पुढे न्यायला सांगितली. काय दम आहे हो यांच्यात? आज महाराष्ट्रात 10 दिवस झाले फिरतोय तरी कुणी गाडी आडवेना ओ.तसेच हिम्मत असेल तर तर गाडी अडवून दाखवाचं?असा गंभीर इशाराचं राणे यांनी दिला.तर तसे गाडीचे टायर मोठे आहेत आमच्या. मला काही फरक पडत नाही. धमक्या बिमक्या नको देऊ, असा इशाराच राणे यांनी यावेळी आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेला दिलाय.
तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की,मी जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठीच आलो आहे.जनतेच्या आशीर्वादामुळेच आतापर्यंत मंत्रीपदे भूषविल्याचेही राणेंनी यावेळी जाहीर केले.केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर पावणे दोन महिन्यानंतर महाराष्ट्रात केवळ माझ्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. अवघ्या १५ – १६ वर्षाचा असताना मी शिवसेनेचा सदस्य झालो आणि त्यानंतर माझ्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. त्यानंतर मी जी काही पदे भूषवली ती केवळ माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने अशा शब्दात नारायण राणे यांनी आपल्या भावना कुडाळकर जनतेच्या समोर व्यक्त केल्या आहेत.यावेळी येणाऱ्या निवडणुका मध्ये संपूर्ण जिल्हा भाजपमय करणार असल्याचं निर्धार त्यांनी केला असून, विरोधकांचा एकही उमेदवार एकही निवडणुकीत निवडून येणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कुडाळ येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.