सिंधुदुर्ग /-

आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश..

राज्यातील ज्या नगरपरिषद, नगरपंचायतीची मुदत माहे नोव्हेंबर अखेर संपत आहे. त्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने एक अध्यादेश प्रसिद्ध करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे निवडणुकीचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी केले आहेत. या आदेशामध्ये म्हटले आहे की, ज्या नगरपरिषद, नगरपंचायतीची मुदत नोव्हेंबर मध्ये संपत आहेत. अशा नगरपरिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून वार्ड रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. प्रभाग रचना पद्धतीत बदल करण्यात आला असून एक वॉर्ड हा प्रभाग समजला जाईल.

हा आराखडा तयार करीत असताना भौगोलिक बदल, नद्या, नाले नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात घ्यावे नगरपरिषद नगरपंचायत अधिसूचनेद्वारे त्याचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावेत. आराखडा तयार करण्याची कार्यवाही तात्काळ म्हणजे २३ ऑगस्ट रोजी सुरू करावी. कच्चा आराखडा तयार केल्यानंतर तात्काळ तो आराखडा निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे कळविण्यात यावा. तयार केलेला कच्चा आराखड्याबाबतची गोपनीयता पाळण्यात यावी. सदरचा कच्चा आराखडा तयार करीत असताना वरील बाबी लक्षात घ्याव्यात.

त्याचबरोबर निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल आहे. न्यायालयाने ४ मार्च २१ रोजी दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणाबाबत असल्याने प्रारूप वार्ड प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमा बाबत सूचना अलाहिदा आपणास देण्यात येतील असेही निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page