सरपंच अक्रम खान यांनी घेतली दखल रस्ता दुरुस्ती सुरुवात..

सावंतवाडी /-

जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे बांदा-कट्टा कॉर्नर येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.तिलारी धरणातील पाणी वेंगुर्ले तालुक्यात नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाईपलाईन टाकण्यासाठी बांदा-कट्टा कॉर्नर येथे खोदाई केली.मात्र पावसामुळे याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होत पादचारी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.याची दखल घेत बांदा सरपंच अक्रम खान यांनी संबंधित ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीच्या सूचना केल्या.अखेर बुधवारी रात्री या चिखलग्रस्त भागात खडी टाकून रस्ता दुरुस्ती काम सुरू करण्यात आले.

दोडामार्ग ते वेंगुर्ले पर्यंत जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही जलवाहिनी बांदा शहरातून आळवडी मार्गे तेरेखोल नदीपात्रातून शेर्ले- वेंगुर्ले येथे नेण्यात आली आहे. बांदा शहरात आठ दिवसांपूर्वीच जनता कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर कामास सुरुवात करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर खुदाई न करता ड्रीलिंग करून बोगद्यातून ही जलवाहिनी शहरात आणण्यात आली आहे.

बांदा शहरात मुख्य चौकात जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. शहरातील जलवाहिनीचे चौकातील काम पूर्णत्वास आले आहे. त्यानंतर तात्काळ माती टाकून खोदण्यात आलेला चर बुजविण्यात आला. मात्र रविवारी चक्रीवाडळाचा तडाखा बसल्याने दिवसभर पाऊस कोसळला. त्यामुळे माती वाहून गेल्याने चौकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी चालणे देखील पादचाऱ्यांना मुश्किल झाले आहे. सरपंच अक्रम खान यांनी तात्काळ जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page