▪️जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
सिंधुदुर्गात अमली पदार्थाचे जाळे सर्व भागात पोचलेय.नवी पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकून आत्महत्यांचे प्रकार वाढताहेत.सुशिक्षित तरूण चोऱ्यांकडे वळत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने धडक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे नेते परशूराम उपरकर यांनी आज केली.
या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन अमलीपदार्थ विक्रीचे जाळे उध्वस्थ करावे असे आवाहन श्री. उपरकर यांनी केले. तर पोलीस च्या हप्तेबाजीमुळे युवा पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
येथील मनसे कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पोलीस विभागामार्फत केवळ कार्यक्रमापुरता अमलीपदार्थ विरोधी दिन अथवा आठवडा असा कार्यक्रम घेतला जातो. ठोस कारवाई hi जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांबाहेर अमली पदार्थ विक्रीचे जाळे भक्कमपणे विणले जात आहे. जिल्ह्यातीलच तरूण कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि गोवा येथून येणारे अमलीपदार्थ विक्रीचे जाळे सांभाळत आहेत. सुरवातीला किनारपट्टीवरील पर्यटकांसाठी अमली पदार्थ पुरवले जायचे. मात्र आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे पदार्थ उपलब्ध होत आहेत.
श्री. उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रीचे हे जाळे जिल्हा पोलीस अधीक्षक उध्वस्थ करू शकतात. परंतु त्यांच्याकडे याचे गांभीर्य पोचवले जात नाही. जिल्ह्यातील काही पोलीस हप्ते बाजी करून अमली पदार्थ विक्रीला सहकार्य करत असल्याची माहिती जनतेकडून आपल्याला मिळत आहे. काही नागरिकांनीही याबाबत पोलिसांना कळविले जाते. शी माहिती मिळताच पोलीस अमली पदार्थ यंत्रणेत गुंतलेल्यांना सावध करतात असाही अारोप श्री. उपरकर यांनी केला. ते म्हणाले, जिल्ह्यात प्रामुख्याने दुचाकीवरून अमली पदार्थ विक्री चालते. हे रॅकेट तोडण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा जिल्ह्यातील तरूण पिढी यात गुरफटण्याची आणि उध्वस्थ होण्याची शक्यता अधिक आहे. अमली पदार्थांच्या हव्यासापोटी सुशिक्षित तरून चोऱ्यांकडे वळत आहेत ही देखील गंभीर बाब असल्याचे श्री. उपरकर म्हणाले.
