मुंबई /-

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर भाजपने माघार घेतली आहे.भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज माघारी घेतील,अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधून केली.

भाजपने माघारीची घोषणा करताच ऋतुजा लटकेंनी सर्व पक्षीयांचे आभार मानले. तसेच आगामी अंधेरीच्या विकासावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. लवकरच लटके या उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

तत्पूर्वी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शरद पवार आणि प्रताप सरनाईकांची निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. यानंतर फडणवीसांवर दबाव वाढल्याची चर्चा होती. अखेर आज भाजपने याबाबत निर्णय घेत माघार घेत असल्याचे सांगितले.

दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवार माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page