सिंधुदुर्ग/-

विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन श्री. आनंद कृष्णा मिराशी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रु.चे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे.त्याबद्दल उद्धवजी ठाकरे, व ना. एकनाथ शिंदे यांचे आ. वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे आचरा उपविभाग येथे कार्यरत असलेले कंत्राटी वायरमन व आचरा, वरचीवाडी येथील रहिवासी श्री. आनंद कृष्णा मिराशी(वय २२) हे विद्युत पोलवर वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने मिराशी कुटुंबावर मोठे संकट ओढवले, श्री. मिराशी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची असून त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता.त्यामुळे मिराशी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मानवतावादी दृष्टिकोनातून एक विशेष बाब म्हणून १ लाख रु. एवढे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. हे आर्थिक सहाय्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले असून त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. लवकरच सदर रकमेचा धनादेश आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे.अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page