सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक निवृत्त झाल्यानंतर संच मान्यतेत मुख्याध्यापक पद असताना सेवा जेष्ठता यादी डावलून प्रभारी मुख्याध्यापक पद सेवा कनिष्ठ शिक्षकास दिले जाते. त्यामुळे सेवाजेष्ठ शिक्षकावर अन्याय होत आहे. सदर शिक्षक संस्थेच्या दबावामुळे तक्रार करत नाहीत. सदर शिक्षकाने नेमकी कोणाकडे दाद मागावी? हा प्रश्न निर्माण होतो, अशी खंत शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी माध्यमिक शिक्षकाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये ही स्थिती आज पहायला मिळते. त्यामुळे यापुढे प्रभारी मुख्याध्यापक पद मान्यता देत असताना किती कालावधीसाठी व किती वेळा मान्यता तिथे द्यायची, हे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर अवलंबून असते. ज्येष्ठ शिक्षकावर अन्याय करायचा की कनिष्ठ शिक्षकाला न्याय द्यायचा, याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही शिक्षक भारतीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
परिपत्रकात काय नमूद :
शासन परिपत्रक शिक्षक व सेवायोजन विभाग क्रमांक- एस. एस. एन./ 26 69 /313 /30 37 दिनांक 14 -8-1979 व शासन शुद्धिपत्रक दिनांक 1/9 /19 80 अन्वये व्यवस्थापनाने केलेल्या नियुक्त्या या नियमानुसार आहेत की नाहीत, याची छाननी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी करून मगच मान्यता देणे आवश्यक असते, असे नमूद करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी यांना महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियम 3(6) यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे या अधिकाराचा वापर करून आपल्या स्तरावरून नियमबाह्य मुख्याध्यापक/ प्रभारी मुख्याध्यापक नियुक्त्या यांची पडताळणी करूनच मान्यता द्यावी. जिल्ह्यात जर चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य मान्यता देण्यात आल्या असतील तर आपल्या कार्यालयासमोर शिक्षक भारती या शासन मान्य संघटनेला आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिक्षक भारतीने आपल्या निवेदनात दिला आहे.
भविष्यात मान्यता देत असताना पडताळणी करून मान्यता द्यावी व अन्याय होत असलेल्या सेवा जेष्ठ शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
