कणकवली /-

कणकवली शहरात गतवर्षी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत एस. एम. हायस्कूल समोरील बॉक्ससेल ब्रिजचा काही भाग कोसळण्याची घटना घडली असतानाच, गेले चार दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गतवर्षी कोसळलेल्या भागाच्या पलीकडचा भाग मोठ्या प्रमाणावर खचून डांबरी रस्त्याला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे हा ब्रिज धोकादायक बनला असून, ठेकेदार कंपनीकडून मलमपट्टी म्हणून भेगा गेलेल्या भागात सिमेंट घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वाहतूक सुरू असलेल्या ब्रिजचा भाग मोठ्या प्रमाणावर खचल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोणत्याही क्षणी हा भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. अन्यथा वाहने जात असताना भाग कोसळला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री व संजय मालंडकर यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून मलमपट्टीचे काम रोखले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page