▪️राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ९८.११ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.१६ टक्केने निकालात घट झाली असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर मंडळाचा ९६.७३ टक्के तर पुणे मंडळाचा ९५.६४ टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर व पुणे मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक कमी निकाल नागपूर मंडळाचा असून ९२.०५ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २७ हजार ९२३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २७ हजार ३९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १४ हजार ४९५ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १४ हजार १४२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.५६ टक्के इतके आहे. मंडळातून १३ हजार ४२८ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १३ हजार २५४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.७० टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण १.१४ टक्के अधिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून १८ हजार ८४० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती पैकी १८ हजार ८०१ परीक्षेस बसले होते. त्यातील १८ हजार ४०७ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९७.९० टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ९ हजार १२२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ८ हजार ९२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९८.५४ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावषीही सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा ०.६४ टक्के इतका अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page