वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात अनियमित व कमी दाबाच्या विजप्रवाहामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.याबाबत वीज वितरण विभागाने मठ गावासाठी कायमस्वरुपी वायरमन देण्यात यावा,अशी मागणी मठ उपसरपंच निलेश नाईक व ग्रामस्थ यांनी केली आहे.
मागील तीन दिवसात मठ गावातील बऱ्याच भागात वीजपुरवठा (लाईट) नसल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. मोठ्या पावसाळी हंगामापूर्वीच ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.याबाबत सहाय्यक अभियंता तोंडले यांच्याशी संपर्क साधून लक्ष वेधण्यात आले आहे, असे निलेश नाईक यांनी सांगितले. येथे दोन कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान एका व्यक्तीने काम सोडले, तर एका व्यक्तीस कमी करण्यात आले आहे. मागील वर्षात मठ गावात उदभवलेल्या चक्रीवादळामुळे ग्रामस्थांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. मोठे कार्यक्षेत्र असलेल्या या गावासाठी संबंधित विभागाने त्वरित दखल घेत कायमस्वरुपी वायरमन द्यावा,अशी मागणी मठ उपसरपंच निलेश नाईक यांनी केली आहे.
