रायगड /-
२२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे महाड मधील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे या गावालगतच्या डोंगरांना तडे जाऊन भूसख्खलन झाल्याने या तीन गावातील शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला तर काहीजण गंभीर जखमी झाले होते. हे वृत्त मुंबईत समजल्यानंतर महाड पोलादपूर माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तातडीने समाज भावनेने एकत्र आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालेल्या दोन्ही तालुक्यात तातडीच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणेशी संपर्क साधला होता. त्यानंतर दरडग्रस्त मदतनिधी संकलन समितीची स्थापन करून या आपद्ग्रस्तांसाठी मुंबई, ठाणे येथील चाकरमान्यांच्या कडून आर्थिक मदतीचे संकलन केले होते. प्रत्येक घरात जाऊन
त्याचे वाटप गुरुवार दि. १९ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले.
तळीये येथील ३०, केवनाळे येथील १३, तर साखर सुतारवाडी येथील १३ कुटुंबे तसेच इतर ६ कुटुंबे अशा एकूण ६२ कुटुंबांना एकूण अकरा लाख दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप तसेच केवनाळे गावातील १४ वर्षीय पाय गमावलेली खेळाडू साक्षी दाभेकरला सुद्धा महाडचे विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मदत करण्यात आली. तर साखर गावातील दरडग्रस्त मुलगी चव्हाण या मुलीच्या लग्नाचे दागिने वाहून गेल्याने संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देत तिच्या लग्नाची जबाबदारी महाडचे किंजलोळी खुर्द भालेकर कोंड गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी घेतली.
शासनाने घोषित केलेल्या गावांच्या पुनर्वसनासह, फार मोठया प्रमाणात शेतीचे व रस्त्यांचे नुकसान झालेल्या पोलादपूर तालुक्यासाठी पाचशे कोटी सरकारने द्यावेत अशी मागणी
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते जितू सावंत, सुभाष पवार, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे, किशोर जाधव, इक्बाल चांदले, बळीराम घाग, प्रमोद गोगावले, एकनाथ सुकूम, कृष्णा कदम, निलेश अहिरे, दिलीप जाधव, तुळशीराम पोळ, रमेश शिर्के, बाजीराव मालुसरे, विनोद पार्टे, चंद्रकांत सालेकर, गेणू मालुसरे, उद्योजक संजय उतेकर, राम साळवी, राम गोळे, लक्ष्मण मोरे, अनिल मालुसरे, अनिल दळवी
पत्रकार प्रकाश कदम, पत्रकार निलेश मोरे इत्यादी उपस्थित होते
