✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून संपूर्ण देशात दिनांक ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या गाव चलो अभियानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभियानाच्या निमित्ताने गावातील प्रभावशाली व्यक्ती, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, आजी-माजी लोकप्रतिनिधी, मोदी सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, शासकीय कार्यालये, शाळा,अनुसूचित वस्ती या सर्वच ठिकाणी भेट देऊन प्रवासी कार्यकर्ते या सर्व घटकांशी संवाद साधत आहेत‌. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने जी अनेक विकासात्मक कामे केलेली आहेत तसेच समाजातील सर्वच घटकांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्याबद्दल सर्वसामान्य जनतेमधून मोदी सरकारचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच येणाऱ्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये लोकांना कोणत्या नवीन योजना अपेक्षित आहेत याबाबत देखील प्रवासी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी जनतेशी चर्चा करत आहेत. या अभियानाच्या निमित्ताने भेट घेण्याकरता आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे घरोघरी स्वागत होत असून आबालवृद्धांच्या प्रेम व आशीर्वादामुळे कार्यकर्ते देखील भारावून गेले आहेत. अनेक लाभार्थी हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार व्यक्त करणारे व्हिडिओ व लेखी संदेश देखील कार्यकर्त्यांना देत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मंडलांमध्ये एकूण ९१७ बुथवर हे अभियान राबवण्यात येत असून आतापर्यंत एकूण २१२ बूथ वर हे अभियान राबवण्यात आले आहे. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली व सर्व प्रमुख पदाधिकारी या अभियानामध्ये सक्रियपणे सहभागी झाले असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये या अभियानाचा झंजावात निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा संयोजक प्रमोद जठार व प्रदेश स्तरावरचे अन्य पदाधिकारी देखील या जिल्ह्यातील अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते हे अभियान यशस्वी करण्याकरता नियोजन पद्धती व अत्यंत तळमळीने काम करत आहेत. या अभियानामुळे येत्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना प्रत्येक बुथवर किमान ६५ टक्के मतदान होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई, सहसंयोजक मनोज रावराणे व संजू परब यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page