लोकसंवाद /- सोलापूर.

माळशिरस तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वेळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी माया अडसूळ यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तृतीयपंथी माया अडसूळ यांनी चक्क स्टँप पेपरवर आपला जाहिरनामा प्रसिध्द केला आहे. त्यांच्या या जाहिरनाम्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

माया अडसूळ या अल्प शिक्षीत असल्या तरी त्यांना गावाच्या विकासाबद्दल ओढ आहे. गावासाठी नवीन काही तरी करून दाखवायचे आहे. याच जिद्दीने त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. मतदारांच्या घरोघरी जावून प्रचार करत आहेत. कॉर्नर सभा घेवून गावाचा काय विकास करणार याची त्या माहित देत आहेत. एवढेच नाही तर निवडून आल्यानंतर गावातील लोकांसाठी आपण कोणती विकास कामे करणार यांचा जाहिरनामा शंभर रूपयांच्या स्टॉम्प पेपरवरच लिहून दिल्याचे ते मतदारांना दाखवत आहेत. तृतीयपंथीच्या स्टॉम्प पेपरवरील या जाहिरनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरनाम्यामध्ये गावात 12 ठिकाणी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देणार, गावातील शाळांना सोलरच्या माध्यमातून वीज पुरवठा करणार, महिलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तयार करणार, प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 आक्सीजन बेडची सोय करणार, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार केंद्र सुरू करणार अशा विविध 20 घोषणा लिहून दिल्या आहेत. हाच जाहिरनामा घरोघरी पोचविण्याचे काम माया अडसूळ या करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page