सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जि प प्रशासनाच्यावतीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज हे पुरस्कार जाहीर केले .
शासनाने ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याऱ्या ग्रामसेवक यांना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव करण्यासाठी शासन निकषानुसार २ ऑक्टोंबर या गांधी जयंती दिनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाने विहीत केलेल्या शर्तीच्या शिफारशीनुसार व शासन निकषानुसार सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हयातील ८ ग्रामसेवकाची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गट विकास अधिकारी यांनी या आदेशानुसार संबंधित ग्रामसेवक यांच्या मूळसेवापुस्तकामध्ये नोंद करावयाची आहे असे आदेशात म्हटले आहे.
पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक याप्रमाणे
देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रदीप रमेश नारकर , कुडाळ तालुक्यातील कवठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतीश श्रीधर साळगावकर ,मालवण तालुक्यातील कातवड घुमडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकाश्रीम. युती युवराज चव्हाण, कणकवली तालुक्यातील नरडवे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वैभव विनायक धुमाळ, दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद श्रीरंग शिंदे वैभववाडी तालुक्यातील गडमठ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील मोहनराव नागरगोजे, सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमित आत्माराम राऊळ यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कारात समावेश आहे.