ओरोस /-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी सामूहिक पाऊल उचलले आहे.यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्या माध्यमातून बचतगट महिला गावोगावी जाऊन प्रबोधन करणार आहेत. एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती ग्रामसभेद्वारे “विधवा प्रथा” बंदचा ठराव घेणार आहेत. त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे औचित्य साधून करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विस्तार अधिकारी आनंद कुंभार आणि नंदू आचार्य यांनी दशावतारी भूमिकेत नाटिका सादर केली. ही नाटिका विधवा प्रथा व या माध्यमातून पतीचे निधन झाल्यानंतर महिलेचे अलंकार उतरविण्यासाठी होणारे मानसिक अत्याचार यावर मार्मिक विवेचन केले. पतीचे निधन झाल्यानंतर मंगळसूत्र काढणे, कुंकू फुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे त्यानंतर बारा दिवस तिला अंधारात ठेवणे या सर्व घटनांवर प्रकाश टाकला. तसेच यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधवा प्रथा पाळली जाणार नाही, याची शप्पथ उपस्थित सर्वांना दिली. त्यामुळे हे सादरीकरण अंगावर काटा आणणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page