वेंगुर्ला /-
कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय सुटतेवेळी एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात, यासाठी भाजपा शिष्टमंडळाने आगारास भेट देऊन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण,जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.चिटनीस समीर कुडाळकर , महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर आदी उपस्थित होते.वेंगुर्ले आगारप्रमुख चव्हाण हे
दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे आगाराला कोणीच वाली उरला नसल्याने वेंगुर्ले एस्. टी.आगारामध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. लाॅकडाऊनच्या काळात वेंगुर्ले डेपोतुन सकाळी सिंधुदुर्गनगरी ही एस्. टी.ची एकच फेरी सुरु आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ग्रामीण भागातील
कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महाराष्ट्रात कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल ते १ मे या कालावधीचे लाॅकडाऊन केले.परंतु त्यामधुन अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.या अत्यावश्यक सेवेमध्ये शासकीय कार्यालय,बॅंका, पोस्ट,आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तसेच अतिआवश्यक सुविधा पुरविणाऱ्या कार्यालयांसाठी बस सेवा सुरू राहणार असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असताना त्यांच्याच आदेशाला हरताळ फासण्याचे काम वेंगुर्ले एस्. टी.आगारा कडून होत आहे.वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागातील कर्मचारी हे शहरी भागात कार्यालयात येतात. तसेच शहरी भागातील कर्मचारी हे ग्रामीण भागात नोकरीनिमित्त जातात.परंतु ग्रामीण भागामध्ये दिवसभरात एकही एस्. टी.ची फेरी चालू नसल्याने त्यांना वेळेवर कामावर हजर राहता येत नाही.विशेषतः महिलांना तर खुपच त्रास सहन करावा लागतो.कारण पुरुष कर्मचारी दुचाकीने जाऊ शकतो. परंतु जी महिला कर्मचारी दुचाकी चालवु शकत नाही, त्यांचे फार हाल होत आहे व नुकसान होत आहे.मुंबई मधील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू रहावी व कर्मचाऱ्यांना वेळेत पोहचता यावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालक व वाहक यांना बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरिता कामगिरीवर पाठवले आहेत.परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मात्र एस्. टी.सेवेपासून वंचित रहावे लागते.याबाबत कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या चालू कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.