भाजपमध्ये जुने भाजप आणि राणे भाजप असे दोन गट..

कणकवली /-

राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकांवेळी आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसला.जनतेकडे मते मागायला गेले तर मतदारांनी त्यांच ऐकलं नाही.कणकवली नगराध्यक्ष भाजपचे असूनही राजन तेलींचे ऐकत नाहीत परस्परविरोधी भूमिका घेतात व आता राजेंद्र म्हापसेकर हे देखील राजन तेलींचे ऐकत नसतील त्यांच्या विरोधात भूमिका घेत असतील तर राजन तेली भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून अपयशी ठरले आहेत. जिल्हाध्यक्ष पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे.भाजपचे पदाधिकारीच ऐकत नसल्याने राजन तेली वैफल्यग्रस्त झाले आहेत.याच रागातून ते शिवसेना नेत्यांवर बेछूट आरोप करत सुटले आहेत.अशी टीका शिवसेना नगरसेवक,गटनेते सुशांत नाईक यांनी केली आहे. भाजपमध्ये जुने भाजप आणि राणे भाजप असे दोन गट सध्या पडले आहेत. नारायण राणे या संधीचा फायदा घेऊन आपल्या समर्थकांना महत्त्वाची पदे वाटत चालले आहेत.राजेंद्र म्हापसेकर यांच्या राजीनामा प्रकरणा वरून प्रमोद जठार व राजन तेली या दोघांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये गटतट नसल्याची सारवासारव केली मात्र या दोघांच्याही पत्रकार परिषदांना राणे समर्थक एकही व्यक्ती उपस्थित नव्हता. यावरून राणे समर्थकांना भाजपच्या आजी – माजी जिल्हाध्यक्षांमध्ये काहीच रस उरला नसल्याचे दिसून येते. राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात हेच घडले आहे.त्याला भाजप अपवाद कसा ठरेल! वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप करणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणेंच्या बेनामी संपत्तीची “ईडी” चौकशी करावी अशी मागणी केली होती त्याचे काय झाले?त्यावर राजन तेली आता गप्प का आहेत? वाझे प्रकरणात जे काही सत्य आहे ते लवकर बाहेर येईलच मात्र राजन तेली आपण केलेल्या मागणीचा वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार आहेत का? याचा त्यांनी खुलासा करावा. जिल्हा नियोजन मध्ये जी कामे आवश्यक आहेत त्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.अपंग प्रस्ताव मंजुरी वरून जिल्हापरिषद राजकारण करत आहे. राजकारणात त्यांनी अपंगांनाही सोडले नाही.शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसारच शाळा दुरुस्तीची कामे घेण्यात आली आहेत.याची माहिती राजन तेलींनी शिक्षण विभागासमवेत बैठक घेऊन करून घ्यावी व त्यानंतर आरोप करावेत. दिलेला निधी खर्च करता आला नाही हे जिल्हा परिषदचे अपयश आहे.त्याचे खापर पालकमंत्री यांच्यावर फोडू नये.माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना आणली त्यावेळी देखील काहीजण या योजनेवर आरोप करत होते.मात्र आ.दीपक केसरकर खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांनी ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविली.आता सिंधु-रत्न योजनेवर देखील अशीच टीका केली जात आहे.मात्र ही योजना देखील येत्या काळात प्रभावीपणे राबविली जाणार असल्याचा विश्वास सुशांत नाईक यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page