वेंगुर्ला /-

८ मार्च हा जागतिक महिला दिन असला तरी आजचे सर्व दिवस हे महिलांचेच आहेत. देशाला आर्थिक सुबत्ता देण्याचे काम महिलाच करू शकतील. यामुळे सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्या आर्थिक प्रगतीसाठी कार्य करावे.जिल्ह्यात आंबा,काजू,नारळ,कोकम,जांभूळ, करवंद, अननस, फणस या फळांवर प्रक्रिया केल्यास खूप मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकेल.आज विस्तारत चाललेल्या काथ्या उद्योगामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
त्यामुळे महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश अधिक सक्षम होईल,असे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक तथा कृषीभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था तसेच कॉयर बोर्ड भारत सरकार यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था येथे
काथ्या उद्योगावर आधारित कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी एम.के.गावडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञाताई परब,वेंगुर्ले नगरपरिषद उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, जि. प. माजी अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, सावंतवाडी माजी पं. स.सभापती प्रियांका गावडे, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, उद्योजक हर्षवर्धन, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सुजाता देसाई, रेडी ग्रा. पं. सदस्य सायली पोखरणकर, कॉयर
बोर्ड चे अधिकारी विष्णु, देविदास, प्रविणा खानोलकर, कविता गोळम, प्रतिभा परब, राखी कलंगुटकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, युवक तालुकाध्यक्ष रोहन वराडकर आदींसह विविध संस्था महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रज्ञा परब म्हणाल्या की,काथ्या उद्योगाच्या माध्यमातून सर्व महिलांच्या सहकार्याने महिला काथ्या संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यामुळे या माध्यमातून पुढे जाऊन सर्व महिलांना सक्षम करूया. महिला सबलीकरणासाठी कॉयर बोर्ड, कोकोनट बोर्ड व आम्ही तुमच्या सोबत आहोत.येथील महिलांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध राहू,असेही त्या म्हणाल्या.यावेळी सभापती अनुश्री कांबळी बोलताना म्हणाल्या की,महिलांनी भूतकाळाचा विचार करण्यात वेळ न घालवता वर्तमानमध्ये वावर केला पाहिजे. विविध क्षेत्रात मार्गदर्शन घेऊन सक्षमपणे पुढे जाणे गरजेचे आहे. आपण आपल्या प्रगतीचा विचार करून निर्भीडपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरे जावे लागेल.वेळेचा सदुपयोग करून आपली प्रगती करून घ्या, असेही त्या म्हणाल्या.यावेळी देवगड येथील महिला उद्योजिका रंजना कदम, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,सभापती अनुश्री कांबळी, प्रियांका गावडे, वामन कांबळे, दिपलक्ष्मी पडते यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान कोव्हीड १९ बाबत शासन नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आभार श्रुती रेडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page