वेंगुर्ला /-
कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात विना मास्क फिरणार्यांवर शनिवार पासून नगरपरिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी मास्क, सॅनिटायझर चा वापर करा तसेच अन्य नियमांचे पालन करावे. उद्यापासून प्रशासनाकडून तीव्र कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्लेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी दिली.
राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पुन्हा एकदा सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. काही नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्याने कोरोना रुग्ण राज्यात वाढत आहेत. त्याला रोखण्यासाठी प्रत्येक नागरीकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
गेल्या दोन दिवसात वेंगुर्ला नगरपरिषद परिसरात मास्क न लावता फिरणाऱ्या ६ जणांवर प्रशासनाने कारवाई केली असून त्यांच्या कडून १ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील भाजी विक्रेते, दुकानदार यांनी स्वतःला संशय वाटल्यास तपासणी करावी, नागरिकांनी शक्य तेवढे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सोंडगे यांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव राज्यात वेगाने होत असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमावली जाहीर केली आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार ही कारवाई वाढविण्यात येणार आहे.