वेंगुर्ला /-

पर्यटन व्यवसाय वृध्दीसाठी ऍक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.त्यासाठी मुंबई, पुणे येथील लोक तुमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे पुणे येथील अनुनाद संस्थेचे सारंग ओक वेंगुर्ले येथे सांगितले.सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने वेंगुर्ले उभादांडा सागरेश्वर येथील दर्याराजा बीच रिसॉर्ट येथे वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सारंग ओक बोलत होते.जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष रविंद्र उर्फ बाबा मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कार्याध्यक्ष सतिश पाटणकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, डॉ. कमलेश चव्हाण, जितेंद्र पंडित, विनोद रेडकर, जगन्नाथ डोंगरे, दिनानाथ वेर्णेकर, प्रशांत प्रभू खानोलकर, बाबली वायंगणकर, लुईस फर्नांडीस, श्वेता हुले, डॉ. शेखर सामंत, सुरज सामंत, गोविंद केळुसकर भैय्या सामंत, शैलेश शिरसाट, खांडेकर मॅडम, दिनानाथ बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम परब, डॉ. शेखर सामंत, सुरज सामंत, महेश सामंत, भैय्या सामंत, शैलेश शिरसाट,श्वेता हुले, गणेश तारी, साची फणसेकर, डॉ. कमलेश चव्हाण, दिनानाथ वेर्णेकर, दिनानाथ बांदेकर,गणपत केळुसकर आदींनी येथे पर्यटन व्यवसाय करीत असताना येणाऱ्या अडचणी व समस्या मांडल्या. सदर समस्यांच्या निवारणासाठी महासंघातर्फे लवकरच प्रांत यांच्या उपस्थितीत पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेण्याचे ठरले.
यावेळी बोलताना बाबा मोंडकर म्हणाले की प्रत्येक तालुक्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या संघाची दखल घेवून शासनाने आता पर्यटन महोत्सवही जाहीर केले आहेत. काश्मीर मधील बर्फ वगळता परमेश्वराने सर्व वस्तू कोकणाला दिल्या आहेत. अतिथी देवो भव या आपल्याकडील संस्कारामुळेच आज आपण बारा ते पंधरा लाख पर्यटकांना येथे सेवा देत आहोत. पर्यटन व्यावसायिकांच्या ज्या काही समस्या असतील, त्या आपण महासंघातर्फे संघठीतपणे सोडविण्याचा प्रयत्न करु.
संघाचे कार्याध्यक्ष सतिश पाटणकर म्हणाले की, साहस, शेती, वैद्यकीय, मेडिकल, जत्रा, बीच, सांस्कृतिक, धार्मिक असे येथील पर्यटन स्थळांचे आठ भागात वर्गीकरण करुन त्यादृष्टीने येथील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना सारंग ओक पुढे म्हणाले की, येथील पर्यटन व्यावसायिकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. येथे छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यटनवृध्दी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे. येथील पानपट्टी स्टॉल धारक, रिक्षा चालक, सुमो चालक, वगैरे प्रत्येक घटकाला बरोबर घेवून काम केल्यासच पर्यटन विकास शक्य आहे. पर्यटन व्यवसाय कसा करायचा याबाबत माहिती द्यायला लोक तयार आहेत. त्याचा आपण वापर करुन घेवू शकतो का, सिस्टीम बसवू शकतो का? याचा विचार व्हायला पाहिजे. पर्यटन व्यवसायात महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येत्या आठ मार्च या जागतिक महिला दिनी एखादे सेमिनार घेता येईल का याचा विचार व्हावा,असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page