वेंगुर्ला /-
थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सिंहाचा वाटा होता,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे जहाल विचारवादी होते.त्यांनी स्वतंत्र फौज तयार केली होती.या देशातील नागरिक जोपर्यंत लढण्यासाठी तयार होत नाहीत किंवा शस्त्राला शस्त्राने उत्तर दिले जात नाही,तोपर्यंत इंग्रज हा देश सोडणार नाहीत,असे त्यांचे ठाम मत होते.तरीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता.आपल्या भाषणात वेळोवेळी महात्मा गांधीजींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख करीत असत.ते फक्त भारतातच लढा देत बसले नाहीत,तर जगातील प्रमुख राष्ट्रांच्या व्यासपीठावर सुद्धा भारताच्या स्वातंत्र्याचा विषय प्रखरपणे मांडत होते.अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.तसेच अनेक स्वातंत्र्यसेनानीनी आपले घरदार,संसार याच्यावर लाथ मारून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले,त्यापैकीच एक सुभाषचंद्र बोस हे होते.इतर राष्ट्रसेनानींपेक्षा सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिमत्त्व थोडे वेगळे होते.लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू,लालबहाद्दूर शास्त्री,छत्रपती शाहू महाराज,यशवंतराव चव्हाण,नानासाहेब गोरे,एस.एम.जोशी,बॅ. नाथ पै या व इतर नेत्यांची चारित्र्ये,पुस्तके
आजच्या तरुण पिढीने वारंवार वाचली पाहिजेत व पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली पाहिजेत,तरच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना खरी आदरांजली ठरेल,असे एम.के.गावडे बोलताना म्हणाले.