वेंगुर्ला /-
रेडी येथे शासनाने रोजगार निर्मितीचा प्रकल्प न आणल्याने २६ जानेवारी पासून कार्यालयासमोर गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण छेडण्यात येणार आहे,असे निवेदन रेडी ग्रामपंचायत च्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना देण्यात आले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,रेडी गावात १९९१ मध्ये सुरू झालेला टाटा मेटॅलिक्स हा पिग आयर्न उत्पादित करणारा प्रकल्प २०१२ मध्ये कच्च्या मालाअभावी पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे रेडीसह जिल्ह्यातील हजारो लोक बेरोजगार झाले.हॉटेल व्यावसायिक,ट्रक वाहतूक करणाऱ्याचे व्यवसायावर मंदी आलेली आहे.सदरचा प्रकल्प पूर्ववत सुरू होणे किंवा त्याठिकाणी नवीन प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे.परंतु वेळोवेळी याबाबत पत्रव्यवहार करूनही सदर ठिकाणी दुसरा प्रकल्प अद्यापही सुरू नसल्यामुळे गावातील लोक बेकार झाले आहेत.त्याठिकाणी सुमारे शंभर एकरचे क्षेत्र असून जवळच कनयाळ तलाव आहे.तरी सदर ठिकाणी शासनाने रोजगार निर्मितीचा प्रकल्प न आणल्याने २६ जानेवारी पासून कार्यालयासमोर गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण छेडण्यात येणार आहे,असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे,
ग्रामपंचायत सदस्य शैलेश तिवरेकर, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम राणे आदी उपस्थित होते.