डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार..

कुडाळ /-

जलसंपदा विभाग, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या ल.पा. योजनेंतर्गत डिगस तळेवाडी ल. पा. तलावाच्या कालवा पुनर्स्थापना (बंदिस्त नलिका वितरण प्रणाली) कामाचा शुभारंभ बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामुळे पाण्याची गळती थांबून डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.या पाण्याचा शेतक-यांनी फायदा घेऊन भातशेतीसह अन्य विविध पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम बनावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य आपण करू असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.

आ.वैभव नाईक यांनी शेतक-यांशी संवाद साधत समस्या जाणून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतीसाठी वेळेत पाणीपुरवठा करण्याबाबतच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

या तलावाचे पाणी कालव्याद्वारे डिगस व आवळेगांव भागात शेतीसाठी सोडले जाते. या ठिकाणचे दोन्ही कालवे उघडे असल्याने तसेच ते नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतक-यांमधून होत होती. याची दखल आ.वैभव नाईक यांनी घेत कालवा पुनर्स्थापना अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. या योजनेंतर्गत चार कि.मी. अंतरावर बंदीस्त पाईपलाईन केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची गळती थांबून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.डिगस व आवळेगांव परिसरातील शेती सिंचनाखाली येणार आहे.

यावेळी जि.प.गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, डिगस सरपंच सतीश सुर्वे, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, डिगस माजी सरपंच बाळा पवार, राजू पवार, ग्रा.पं.सदस्य मनोज पाताडे, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडीचे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर, शाखा अभियंता विलास गोसावी, तांत्रिक सहाय्यक महेश आंदुर्लेकर, आप्पा आंगणे,
ठेकेदार श्री. येडगे, उपतालुका प्रमुख बाळू पालव, विभाग प्रमुख दीपक आंगणे, मंदार कोठावळे, संकेत सावंत, गुरू पवार, सुयोग ढवण, शेतकरी अर्जून दुखंडे, जनार्दन सावंत, कृष्णा सावंत, महादेव सावंत आदींसह डिगस व आवळेगाव येथील शेतकरी उपस्थित होते.

गटनेते नागेंद्र परब व जि.प.सदस्य अमरसेन सावंत यांनीही या तलावाच्या पाण्याचा शेतक-यांनी पुरेपूर फायदा घेऊन कृषीक्रांती करावी असे आवाहन केले. यावेळी ल.पा.विभागाचे अधिकारी श्री.कविटकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page