अवैध वाळु वाहतूक करणारा पिकअप आणि मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून या महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत.

पंढरपूर : पंढरपूर इथं अंबाबाई पटांगणाच्या लगत असलेल्या चंद्रभागा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अवैध वाळु वाहतूक करणारा पिकअप आणि मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून या महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहरातील गोविंदपुरा इथले पती-पत्नी सोलापूरच्या दिशेने निघाले असताना अंबाबाई मैदानालगत असलेल्या नवीन पुलावर हा अपघात घडला. त्यांच्या पाठीमागून प्रचंड वेगाने येणाऱ्या वाळुच्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जवळपास पन्नास ते साठ फुट त्यांना फरफटत नेलं. यामुळे अंगावर खोलवर जखमा झाल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जयश्री बारले या जागीच ठार झाल्या आहेत. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर इथं हलवण्यात आलं आहे. अवैद्य वाळू वाहतुकीमुळे हा बळी गेल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयश्री यांचा मृतेदह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमी प्रकाश यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू पाहिल्याने प्रकाश बारले यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून बारले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page