कुडाळ /-

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपरिहार्य असलेला सिंधुदुर्ग चिपी विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्याकरिता, माननीय श्री. सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री माननीय. श्री. हरदीप पुरी यांना व्यक्तिश: विनंतीपत्र पाठवले होते. या पत्राची तत्परतेने दखल घेऊन मंत्रीमहोदयांनी सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकार्याशी संबंधित कार्यवाहीला वेग देऊन त्याबाबत श्री. सुरेश प्रभू यांना व्यक्तीश: पत्र पाठवून अवगत केले आहे.

नागरी विमानन संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाला भेट देऊन परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे कार्यान्वन, प्रशिक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळाच्या विकासकांना दिले आहेत. श्री. सुरेश प्रभू यांनी नागरी विमाननमंत्री असताना देशांतर्गत विमानवाहतूक मार्गांसाठी कार्यान्वित केलेल्या उडान या योजनेअंतर्गत अलायन्स एअर या विमानकंपनीला चिपी विमानतळावरील उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली आहे. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचे अधिकांश काम नजीकच्या काही वर्षांमध्ये पूर्ण झालेले असून विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी जानेवारी २०२१ अखेर हे लक्ष्य ठेवले गेले आहे. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व भागधारकांशी आवश्यक तो समन्वय साधावा याकरिता केंद्रीय नागरी विमानन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यशासनाला विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page