सरपंच साची फणसेकर, ग्रा प सदस्यांच्या आंदोलनाला यश ..

वेंगुर्ला /-

तालुक्यातील कोचरे येथे दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर होऊन सुद्धा कार्यान्वित न झाल्यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या अभियानाचा कोचरे गावाला कोणताही उपयोग होत नसल्याचे सांगत याविरोधात येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश तेली यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले होते. दरम्यान या उपोषणाच्या ठिकाणी सरपंच साची फणसेकर, ग्रा.प.सदस्य प्रतीक्षा पाटकर, सरस्वती राऊळ, पूजा गोसावी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी सकाळपासून सुमारे ७ तास चाललेले हे उपोषण दूरसंचार चे जिल्हा प्रबंधक मांजि यांच्या कोचरा गावात फेब्रुवारी महिन्यात टॉवरचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र सरपंच साची फणसेकर यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
तालुक्यातील कोचरे गावांमध्ये नेटवर्क मिळत नाही त्यामुळे सरपंच साची फणसेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व खासदार विनायक राऊत यांना विनंती करून बीएसएनएल टॉवर मंजूर करून घेण्यात आला होता. या टॉवरला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, मात्र जागे अभावी हे काम रखडले होते. गावाची गरज व हित लक्षात घेता स्वतः
ग्रा. प. सदस्य योगेश तेली यांनी मोबाईल टॉवर साठी जागा उपलब्ध करून दिली व कायदेशीर बाबी पूर्ण करून डिसेंबर २०१८ मध्ये बीएसएनएल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतू दीड वर्षे होऊन सुद्धा हे काम पूर्ण करण्यात आले नाही. मोबाईल टॉवरचे काम पूर्ण करून तात्काळ कार्यान्वित करावा यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून सरपंच साची फणसेकर यांनी वारंवार पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी काही दिवसात काम चालू होईल, असे कारण सांगून कामात चालढकल केली गेली. नेटवर्क नसल्याने गावात कुणी आजारी पडल्यास वाहन उपलब्ध करण्यासाठी संपर्क होत नाही.रास्त दराच्या धान्य पुरवठासाठी वापरण्यात येणारे डिजिटल प्रणाली तसेच सद्य स्थितीत सुरू असलेली शिक्षण प्रणाली अथवा गावातील शासकीय कार्यालयाकडून मिळणारे दाखले यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. गावात नेटवर्क नसल्याने आपत्कालीन व नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास शासकीय यंत्रणेशी संपर्क करता येत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी गेली दीड वर्षे रखडलेले बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम तात्काळ पूर्ण करून हा मोबाईल टॉवर कार्यान्वित करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगेश तेली यांनी बेमुदत उपोषण केले. यावेळी जोपर्यंत मोबाईल टॉवरचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, असा निर्धारही यावेळी त्यांनी केला होता.
दरम्यान येत्या २५ डिसेंबर २०२० पासून १५ जानेवारी २०२१ पर्यंत हे टॉवरचे काम पूर्ण होऊन मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मोबाईल सेवा कोचरा गावात सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्र सरपंच साची फणसेकर यांना दूरसंचार जिल्हा प्रबंधक एस आर मांझी उपोषणस्थळी भेट देत सुपूर्द केले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाला , राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम के गावडे, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील डुबळे, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, शाखा प्रमुख आपा राऊळ, विभाग प्रमुख विष्णू माधव, वसंत साटम, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, केळुस माजी सरपंच योगेश शेटये
प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर विकास फणसेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि प गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, यांनी मोबाईल द्वारे संपर्क करत दुरसंचारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यशस्वी शिष्टाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page