कणकवली / –

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आज कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रमसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषिसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली. तसेच स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली.

नाटळ हिरकणी प्रभागसंघातील विश्व ग्रामसंघ कुंभवडेच्या महिलांनी गावात प्रभात फेरी काढली व स्वच्छता केली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता अनंत सावंत, सचिव प्राजक्ता प्रदीप सुतार, कोषाध्यक्ष सुलोचना सखाराम सावंत, सीआरपी ताई सारीखा संतोष सावंत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सावली ग्रामसंघ नाटळच्या महिलांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभागसंघ/ ग्रामसंघ अध्यक्ष रविना रवींद्र सुतार, सचिव शांती पॉली फर्नांडिस, सीआरपी ताई योगिता एकनाथ चव्हाण, सीआरपी ताई तन्वी तुळाजी राणे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

तर जिद्द ग्रामसंघ नरडवेच्या महिलांनीही उत्स्फुर्तपणे गावात प्रभातफेरी काढली. यामध्ये सीआरपी ताई पूजा गोविंद सावंत, कृषी सखी गीतांजली गुरुनाथ कांदे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. आधार ग्रामसंघ दारीस्ते संघाने आपल्या गावात प्रभातफेरी काढली सीआरपी ताई जान्हवी पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्ष नमिता नामदेव सुतार, सचिव श्वेता बाबू शिरसाठ, कोषाध्यक्ष रश्मी राजेश साळसकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी सर्व ग्रामसंघाच्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया गोळा केला. हि रक्कम शासनाला पाठविली जाणार असून, तुमच्याकडे पैसे नसेल तर आम्ही देतो मात्र हे अधिकारी आणि कर्मचारी कमी करू नका, आम्हाला आत्मनिर्भर करणाऱ्या या लोकांना ठेवा आणि अभियान वाचावा असा मेसेज दिला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सन २०१३ पासुन उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हृयामध्ये उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूह सक्षमीकरणाची (बचत गट) प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वयंसहाय्यता समूहाचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतून लाखो कुटुंब उमेद अभियानाला जोडली गेलेली असून त्यामूळे गरीब कुटूंबांना रोजगार व उत्पन्न वाढीच्या संधी प्राप्त होवून त्यांचे जीवनमान उंचावन्यास सुरुवात झालेली आहे. मात्र हे ज्या कर्मचाऱ्यांनी घडवून आणलं त्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश आल्यामुळे सध्यस्थितीत चार हजारहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हे अभियान राबवून महिलांना स्वयंरोजगाराचा आत्मविश्वास दिला त्या अधीकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आता या महिला भगिनी उभ्या राहिल्या आहेत.

यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या की उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे, तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो मात्र या अधिकाऱ्यांना काढून हे अभियान बंद करू नये अशी मागणी या महिलांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page