सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याविषयी पुढील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे आम नाईक यांचे समितीला आश्वासन

कुडाळ – मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील एकमात्र ऐतिहासिक मंदिरासाठी दिल्या जाणार्‍या भत्त्यामध्ये वाढ करण्याविषयी हिंदुजनजागृती समितीच्या वतीने श्री.सुनिल घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक यांनी येथील शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याविषयी पुढील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असे आश्वासन दिले आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनांत म्हटले कि. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी सरकारकडून प्रतीमहिन्याला केवळ २५० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. छत्रपती शिवराय नसते, तर महाराष्ट्राची भूमी आज आक्रांतांच्या ताब्यात असती. शिवरायांनी महाराष्ट्राच्या भूमीचे आणि येथील संस्कृतीचे प्राणपणाने रक्षण केले. त्यासाठी उभे आयुष्य वेचले. अशा राष्ट्रपुरुषांच्या मंदिरासाठी प्रतीमहा केवळ २५० रुपये देणे, ही गोष्ट शासनासाठी शोभनीय नाही. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या अल्प भत्त्यामध्ये मंदिरात दिवा बत्ती करणे, वीजदेयक भरणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी प्राथमिक आणि अत्यावश्यक गरजांचीही पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मंदिरासाठी वाढ करावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूत्र राजाराम महाराज यांनी वर्ष १६९५ मध्ये हे मंदिर बांधले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतातील हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाचे ठसे आजही जतन करून ठेवण्यात आले आहेत. अशा या स्थळाचा ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवून हे ठिकाणी पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. या मंदिरासाठी शासनाकडून प्रतीवर्षी २ हजार १०० रुपये इतका भत्ता दिला जातो. याविषयीचा महसूल आणि वन विभागाचा दि. १ एप्रिल १९७० चा शासन आदेश उपलब्ध आहे. मंदिराला भत्ता देण्याचा निर्णय दि. ३० मार्च १९७० या दिवशी शासनाने घेतला. वर्ष १९७०-७१ पासून मंदिराला दिल्या जाणारा वार्षिक भत्ता वाढवून ३ सहस्र रुपये इतका करण्यात आला; मात्र यानंतर हा भत्त्यामध्ये वाढ केल्याची नोंद सापडत नाही. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या अजोड कार्याची माहिती देणे आता आवश्यक आहे. महाराष्ट्रात मुगलांच्या अत्याचाराची परिसीमा गाठली असतांना सर्वसामान्य कुटुंबातील मावळे एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे, हे शिवरायांचे कार्य अजोड आहे. शिवरायांचा या कार्याचा इतिहास केवळ युवकांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक,ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी. त्यामुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांचे पर्यटनासह त्यांच्यात राष्ट्राभिमान निर्माण होण्यास सहाय्य होईल. त्यामुळे सरकारने लक्ष देऊन यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,मंदिराची पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.छत्रपती शिवरायांचे हे भारतातील एकमात्र मंदिर आहे. पर्यटन विभाग, शासनाचे प्रतिनिधी, तसेच इतिहासतज्ञ यांनी एकत्रितपणे मंदिराची पहाणी करून मंदिराचे जतन आणि शिवरायांच्या कार्याची माहिती देण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण आराखडा निश्चित करावा. यासाठी आवश्यक तो निधी सरकारकडून देण्यात यावा आणि कालमर्यादा निश्चित करून हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याविषयी पुढील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page