कणकवली /-
सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली आयोजित मालवणी कवी सम्मेलन 04 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी शिवशक्ती हॉल मध्ये पार पडले. मच्छिंद्र कांबळी यांचा हा 75 वा जयंती दिवस. त्यांच्या प्रतिमेला वंदन करून व मालवणी भाषेच्या वृद्धीसाठी मालवणी बोलीभाषेतून गाऱ्हाणे घालून काव्यमैफिलीला सुरुवातझाली.
भोवतालकार मालवणी कवी विनय सौदागर यांनी त्यांच्या खालव काय आणि खातव काय, पावस येताहा, कैद, आजून व्हाळयेक पाणी हा या लोकप्रिय कविता सादर केल्या.
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाचा सुरुवातीचा खडतर प्रवास व नंतर पु. ल. देशपांडे यांच्या चांगल्या अभिप्रायाने हे नाटक कसे यशस्वी झाले याचा उलगडा केला. स्वतःच्या जीवनातील अर्धवट किशोर वयात म्हैसम्मा नावाची एक मुलगी त्यांच्यावर प्रेम करत होती, याची अधुरी गजाल त्यांनी सांगितली.
मालवणी बोलाचा डेरिंग , भाषेक उर्जितावस्था मच्छिंद्र कांबळे व गंगाराम गवाणकर यांच्या वस्त्रहरण नाटकाने आली असे म्हणत सम्मेलनाचे अध्यक्ष सुनंदा कांबळे यांनी सपनात येव नको, कोजागिरी, रामायणाची गजाल या सुंदर मालवणी कविता सादर करत काव्य संमेलनात रंगत आणली. उदय सर्पे, सुरेश पवार, स्वप्नील वेंगुर्लेकर, सरिता पवार, साक्षी हर्णे, प्रगती पाताडे, सतीश चव्हाण, राजेंद्र गोसावी, प्रसाद पंगेरकर इ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. सुधाकर ठाकूर, डॉ. अशोक कदम, शुभांगी पवार यांच्यासह अनेक काव्यरसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन रीमा भोसले यांनी केले. आभार सुरेश पवार यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी सिंधुवैभव साहित्य समूहाच्या शैलेश घाडी, ओंकार चव्हाण, मीनाक्षी चव्हाण, माधवी चव्हाण, हृतिक मेस्त्री, मनाली राणे व डॉ. सतीश पवार यांनी परिश्रम घेतले.