मुंबई /-

देशातील काही भागांत तापमानाचा पारा वाढत आहे. पुढील ४८ तासांत राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पुढील २४ तासांत गुजरात आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवरील कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-ईशान्य दिशेकडे सरकले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आज १८ मार्च रोजी बंगालच्या उपसागराच्या आग्नेयकडे आले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे रुपांतर २१ मार्च पर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राजस्थान, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ, मध्य महाराष्ट्र, गुजरात राज्यातील अनेक भागांत, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सियस आणि त्याहून अधिक नोंदवले गेले आहे. राजस्थानच्या पश्चिम भागात काल उष्णतेची तीव्र लाट होती. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंशांने अधिक नोंदवले गेले आहे.दरम्यान, उद्या १९ रोजी अंदमान आणि निकोबारमधील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page