वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील पाल मातोंड सड्यांवर सातत्याने गेली चार वर्षे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी सभापती तथा पं. स.सदस्य यशवंत परब यांनी मांडला.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा आज शुक्रवारी सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या नूतन सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती सिद्धेश परब, गटविकास अधिकारी उमा पाटील, पंचायत समिती सदस्य यशवंत परब, साक्षी कुबल, स्मिता दामले, मंगेश कामत, शामसुंदर पेडणेकर,गौरवी मडवळ व विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.दि. १३ मार्च २०२२ रोजी विद्यमान पं. स.सदस्यांचा कार्यकाल संपत आहे.याबाबत सर्वप्रथम प्रशासनाच्या वतीने सभापती अनुश्री कांबळी, उपसभापती सिद्धेश परब व अन्य उपस्थित पंचायत समिती सदस्य यांचा तसेच सहकार्याबद्दल उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी एमएसईबी चे अधिकारी सभेस उपस्थित नसल्याने यशवंत परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.एखादया ग्राहकाचे वीज बिल भरायचे राहिल्यास संबंधित विभागाकडून थोडीशीही माणुसकी दाखवली जात नाही.मात्र तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. संबंधित आंबा आंबा – काजू बागायतदार यांना शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असा ठराव त्यांनी मांडला. यावेळी पंचयादी एमएससीबी कडे पोहोचल्या की नाहीत हे आठ दिवसात लेखी स्वरूपात अहवाल द्या, अशी मागणी परब यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली.यावेळी पंचयाद्या भरपूर होतात,पण नुकसानी काहीही मिळत नाही,असे मत स्मिता दामले यांनी व्यक्त केले.दरम्यान याबाबत बीडीओ उमा पाटील यांनी एमएससीबीशी समन्वय साधावा,अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन युनिटसाठी शासनाकडून १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यासाठी वेंगुर्ले तालुक्यातून परुळेबाजार ग्रा.पं. चा प्रस्ताव प्राप्त झाला आहे,अशी माहिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संदेश परब यांनी सभागृहात दिली.याबाबत उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्यानंतर सविस्तर चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतीना कळवून पुढील चर्चा करुन जागा निश्चित करण्याचे व शासनास कळविण्याचे सभागृहात ठरविण्यात आले. प्लॅस्टिक कलेक्शन युनिट साठी निधी मंजूर असून त्याप्रमाणे तालुक्यात मध्यवर्ती सोयीच्या ठिकाणी प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यासाठी चर्चा झाली. यावेळी यशवंत परब यांनी आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, ज्या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे किंवा प्रत्येक जि.प.निहाय एक प्रकल्प दिला तर योग्य होईल,प्रोजेक्ट व्यवस्थित सुरू राहिला पाहिजे याबाबत माहिती घ्यावी, जागेची उपलब्धता नुसार उभादांडा, शिरोडा येथे पर्यटनास वाव असल्याने त्यादृष्टीने योग्य नियोजन व्हावे, अशी सूचना यशवंत परब यांनी मांडली.मंगेश कामत यांनी शासन निधीचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.तर गौरवी मडवळ यांनी ज्यांनी या प्रकल्पाबाबत तयारी केली आहे, त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी सूचना मांडली. तसेच उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी पर्यटनाच्या दृष्टीने सदर प्रकल्प शिरोडा येथे व्हावा,अशी सभागृहाकडे मागणी केली.दरम्यान याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर पुढील चर्चा करुन जागा निश्चित करण्याचे व शासनास कळविण्याचे ठरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page