कणकवली/-

कणकवली नगरपंचातीची सार्वत्रिक निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. त्यासाठी नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे न.पं. वर सत्ता स्थापनेसाठी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पेटणार आहे. यानिमित्ताने पुन्हा समीर नलावडे यांना संधी निर्माण झाली आहे. तर नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांना जोरदार तयारी करुन संघर्ष करावा लागणार आहे.

मागच्या निवडणुकीत शिवसेना नेते संदेश पारकर यांचा पराभव करत समीर नलावडे यांनी बाजी मारली होती. आता या वेळी पुन्हा सर्वसाधारण नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडल्याने या नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून पुन्हा समीर नलावडे यांना संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तसेच पुन्हा एकदा पारकर विरुद्ध नलावडे असा सामना कणकवलीच्या नगरपंचायत निवडणुकीत रंगू शकतो का? हे पण पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कणकवली नगरपंचायत ही गेली १५ वर्ष राणेंच्या ताब्यात राहिली आहे. या स्थितीत राणेंकडून नगरपंचायत आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेनेसोबत यावेळी महाविकास आघाडीतील घट पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी हे सोबत असणार की शिवसेना एकटीच लढणार ते आता महत्त्वाचे ठरणार आहे. कणकवली नगरपंचायत वरील सत्ता मिळवणे हे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे असणार आहे. दरम्यान ज्या पद्धतीने शिवसेनेकडून कणकवली नगरपंचायत वर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकता तसेच प्रयत्न भाजपाकडून आमदार नितेश राणे व विद्यमान नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडूनही होणार आहेत. विद्यमान नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागील चार वर्षाच्या कारकीर्दीचा आलेख पाहिला असता जनतेची कामे करण्यावर त्यांनी दिलेला भर व नाविन्यपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करत टीम वर्क चे काम हे त्यांना फायदेशीर ठरणार आहे.

कणकवली शहरात विकसित केलेले नवीन रस्ते, किंवा अन्य विकास कामांच्या बाबींच्या अनुषंगाने शिवसेनेसमोर नलावडे यांच्या रूपाने देखील मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता काही महिन्यातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचे पडघम वाजू लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page