वेंगुर्ला/–
चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतानाच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यास ग्रामस्थांनी आपल्याशी संपर्क साधावा व ही बाब आपल्या व इतर लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून द्यावी म्हणजे आम्हाला संबंधित अधिका-यांना सूचित करून चांगल्या दर्जाचे काम करून घेता येईल, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी तुळस येथे उपस्थितांना केले.वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करीत सोमवारी ग्रामस्थांनी रस्ता दुरूस्तीचे काम रोखले होते.याबाबत मंगळवारी तुळस ग्रामपंचायत कार्यालय येथे आ. दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बेठकीप्रसंगी ग्रा.पं.तुळस येथे ते बोलत होते.यावेळी पं. स.सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,तुळस सरपंच शंकर घारे,उपसरपंच सुशिल परब,आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग चे सचिव नंदन वेंगुर्लेकर, माजी सभापती प्रफुल्ल परब,मातोंड सरपंचा जान्हवी परब,होडावडा,पेंडूर सरपंच,तुळस ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर, शेखर तुळसकर,शिवसेना विभागप्रमुख संजय परब,माजी सरपंच आपा परब,जगदीश परब,तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रथमेश सावंत,सा.बां.विभाग सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण,उपविभागीय अभियंता शशांक भगत, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळस रामघाट रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. तुळस व होडावडा गावातील हमरस्त्याला गटार व पाईप नसल्यामुळे पावसाळी मोसमात ठिकठिकाणी पाणी साचून रस्त्याची दुर्दशा होते.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तुळस श्री देव जैतिर मंदिर ते काजरमळीपर्यंत सुमारे तीन कि.मी.रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून खडी उखडून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.शिवाय वाहनांच्या टायरची मोठ्या प्रमाणात झीज होत आहे.या मार्गावर छोटे-मोठे अपघातही घडले आहेत.अशा अनेक समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी वाचला.ग्रामस्थांच्या मागणीनुसार या बाबी जर अंदाजपत्रकात समाविष्ट असतील तर त्या बाबींची पूर्तता करुनच रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरु करावे,अशा सुचना केसरकर यांनी केल्या.दरम्यान खड्डे बुजविण्यात येतील,तसेच आवश्यक ठिकाणी गटारांची खोली वाढविण्यात येणार असून ज्या ठिकाणी पाणी तुंबते अशा ठिकाणी मोरी बांधकाम करण्यात येणार आहे.