कणकवली /-

मुंबई गिरगांव साहित्य संघात चित्रपट-नाटक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत एकता कल्चरल पुरस्कार वितरण सोहळ्यात आयनल येथील कथा आणि ललित लेखक प्रा.वैभव साटम यांना नारायण सुर्वे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर कणकवली-कलमठ येथील कवयित्री प्रमिता तांबे यांना एकता कल्चरलच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सन्मानित करण्यात आले.

यावेळी 2021 सालच्या एकता कल्चरल जीवन गौरव पुरस्काराने अभिनेते विजय कदम यांना गौरविण्यात आले तर अभिनेत्री प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्काराने अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांना आणि नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने प्रा. वैभव साटम यांना गौरविण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात मान्यवरांनी प्रा.साटम यांच्या ललित लेखनाचा आणि प्रमिता तांबे यांच्या यावेळी झालेल्या काव्य वाचनाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्या गुणवत्तेची दखल घेतली.

या सन्मानाबद्दल बोलताना प्रा. साटम म्हणाले, मीही सिंधुदुर्ग भूमीतील आणि कविवर्य नारायण सुर्वेही सिंधुदुर्ग भूमीतील. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझा मोठा बहुमान आहे. सिंधुर्गात गुणवान लेखक कवी आज लिहीत असून त्या सर्वांच्या गुणवत्तेचा आदर राखून हा पुरस्कार मी स्वीकारला आहे. तर तांबे म्हणाल्या चित्रपट नाटक साहित्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबर मला सन्मानित करण्यात आले हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page