सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्गात वातावरण चांगलंच तापलंय.नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण आहे,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची होणारी निवडणूक. या निवडणुकीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी राणे काहीही करतील, असं जाणकारांचं मत आहे.

दरम्यान, संतोश षरब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा राजकारण आणखीनंच तापलं. या हल्ल्यामागे नितेश राणे असल्याचा आरोप झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा तळकोकणात सुरु असलेल्या राणेंच्या राजकारणाकडे डोळे लावून बसला नसता, तरच नवल! झालंही तसच. ज्या सगळ्यावरुन सिंधुदुर्गात राडा सुरु आहे, त्या जिल्हा बँकेला इतकं महत्त्व का आलंय, हेही समजून घ्यायला हवं.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला का इतकं महत्त्वं?

नारायण राणे यांचा मुलगा भाजप आमदार आहे. नारायण राणेंनाही आता केंद्रीय मंत्रिपद मिळालंय. अशावेळी कोकणातली त्यांची ताकद वाढलेली आहे, हे तर उघडच आहे. अशा राजकीय दबदबा असणाऱ्या कोकणातील एका मोठ्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला जो भाजपचा आमदार आहे, त्याच्यावर नॉट रिचेबल होण्याची वेळ येणं, ही गोष्ट नेमकं काय सूचित करते? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सध्याचे अध्यक्ष सतिश सावंत यांचे खंदे समर्थक असलेल्या संतोष परबांवर हल्ला झाल्यानंतर लगेचच या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात आहे, असे आरोप केले गेले होते. पोलिसांनी कारवाई सुरु केली. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नितेश राणेंनी आपल्या ‘मॅव मॅव’च्या घोषणांनी अख्खा दिवस गाजवला होता. पण शनिवारपासून नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आता या सगळ्या गडबडीचं मूळ आहे, सिंधुदुर्गाची जिल्हा बँक. ही जिल्हा बँक राणेंसाठी इतकी महत्त्वाची का बनली आहे? या जिल्हा बँकेवर आपली सत्ता असावी, यासाठी राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा जन्म

ते साल होतं, 1983. याच वर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी जिलह्याचं विभाजन झालं आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक जन्माला आली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला 38 वर्ष झाली आहेत. एक मोठा काळ या बँकेवर सत्ता गाजवली, ती नारायण राणे यांनीच. मात्र राणेंच्या विरोधात सतीश सावंत यांनी बंड केलं. ते शिवसेनेत गेलेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी राणेंच्या विरोधात सतीश सावंत यांनी स्वतःच अस्तित्व आजमावण्याचा प्रयत्न केला. सतिश सावंत हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे. आणि सध्या ज्या संतोष परब यांच्यावर हल्ला झाला आहे, ते संतोष परब हे सतीश सावंत यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

शिवसेना वि. भाजप थेट सामना!

कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप किंवा आताच्या घडीला महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा थेट सामना या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार, असं चित्र निर्माण झालं आहे. 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष राणेंच्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2019साली शिवसेनेच्या ताब्यात गेली.2019मध्ये विधानसबा निवडणुकांनंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेला तळकोकणात फायदा होईल, असंही काही जाणकार सांगतात. अशातच राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा बँक पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार, हेही स्पष्ट आहे.

2020वर्षी कोरोनामुळे जिल्हा बँकेला मुदतवाढ देण्यात आली. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या बँकेची निवडणूक आता लवकरच होणार आहे. सतीश सावंत यांच्याकडून राणेंना आव्हान देण्याचा प्रयत्न झाला नसेल, अशीही शक्यता कमीच आहे. त्यामुळे सहकार विभागाचं लक्ष या जिल्हा बँकेकडे लागलेलं आहे. आता होणाऱ्या निवडणुकीत राणे पुन्हा आपली सत्ता या जिल्हा बँकेवर स्थापन करु शकतात का, की सतीश सावंत पुन्हा बाजी मारणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page