मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन श्री केसरकर यांनी केली मागणी.
वेंगुर्ले /-
मठ गावातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई मिळवून द्या, अशी मागणी आमदार दिपक केसरकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील तौक्ते वादळ काही नुकसानग्रस्तांना सुद्धा अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांच्यासाठी ३ कोटी ९५ लाख २२ हजार २४ रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत त्यांनी श्री.वडेट्टीवार यांची भेट घेतली.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मठ येथे झालेल्या चक्रीवादळामध्ये घरे व बागायतींचे प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर श्री. केसरकर यांनी नुकसानग्रस्त यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी स्थानिक ग्रामस्थ , तहसिलदार , डी.डी.ओ , कृषी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सदर नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता तौक्ते वादळाच्या धर्तीवर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी श्री. केसरकर यांनी केली आहे.