रत्नागिरी /-
एसटी कर्मचाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन चालू ठेवले आहे. दरम्यान आज सकाळपासून आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्यांसाठी मदत सुरू केली आहे. त्यामुळे एसटी बंद असली तरी प्रवासी वाहतूक व्हावी याकरिता शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
काल राजापूर आगारातून सुटलेल्या गाड्या वगळता दिवसभरात जिल्ह्यातून एकही गाडी स्थानकातून बाहेर पडली नाही. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणासाठी उत्स्फुर्तपणे सुरू झालेल्या बंदला आजही तिसऱ्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. एसटी वाहतूक शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातून येणार्या सर्वसामान्यांची गैरसोय झाली. बंद मिटण्याची शक्यता धुसर आहे. राज्य शासनाने अद्याप बंदबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा बंद कर्मचारी कधी मागे घेणार आणि सामान्य प्रवाशांचे कसे होणार हा मोठा प्रश्न आहे.