सावंतवाडी /-
राज्य शासनाने एसटी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. सावंतवाडी एस.टी. स्टॅण्ड समोरील जागेत हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन केल्याने नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र पुरते हाल झाले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व इतर मागण्यांसाठी राज्यभरात सुरु असलेल्या संपामध्ये कणकवली विभागातील कर्मचाहीही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासूनच कामबंद आंदोलन सुरु केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली.सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आवठवड्यात बेमुदत उपोषण सुरु केले होते. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार उपोषण मागे घेण्यात येत असले तरीही महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे या मागणीसाठी गेले बारा दिवस राज्यभरात ठिकठिकाणी कामबंद आंदोलन सुरु केल्याने एस.टी. महामंडळाची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. सावंतवाडी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत महामंडळाचे शासनात विलिनीकरण झाले पाहिजे अशी मागणी लावून धरली. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी नोकरीनिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
कोरोना काळामध्ये अनेक कामगारांची कुटुंबे उध्वस्त झाली. त्यांना अजूनही योग्य तो मोबदला मिळाला नाही. अजूनही काही कामगार तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. त्यातच जो दिवाळी बोनस राज्य सरकारने जाहीर केला तो थट्टेचा विषय बनला आहे. गेली कित्येक वर्षे विलनिकरणाची मागणी केली जात होती ती सुद्धा मान्य करण्यात आली नाही. अशा सर्वच मागण्या घेऊन आज एस. टी. कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.