मालवण /-
मालवण तालुक्यातील काळसे गावात पाच शेतकऱ्यांची गाय जातीची जनावरे अज्ञात रोगाने दगावली आहेत. सदर रोगाची लक्षणे अगोदर काही समजत नसल्याने चालते फिरते जनावर अचानक दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. मंगळवार २६ आणि बुधवार २७ ऑक्टोबर या दोन दिवसात काळसे गावातील अनिल भगवान प्रभू, अण्णा गुराम, सुनिल वरक, गुरुनाथ बळीराम जुवेकर, रोहन परब या पाच शेतकऱ्यांच्या गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. तरी पशुसंवर्धन विभागाने तातडीने या रोगाचा शोध घेऊन इतर जनावरांची तपासणी करावी. आणि शेतकऱ्यांना या संकटापासून वाचवावे अशी मागणी काळसे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच ज्या गरीब शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई मिळावी अशीही मागणी काळसे गावातील ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.