कणकवली /-
खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील बरीच वर्षे खड्डे पडून खराब झालेला रस्ता वाडीतील सर्व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येत श्रमदानातून रस्ता पूर्ण केला. खारेपाटण कोष्टयेवाडी येथील नागरिकांनी केलेल्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. खारेपाटण कोष्टयेवाडी येथील रस्ता खराब झाला असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून जात येता वाहनांना आदळ आपट करत जावे लागत आहे.तर जेष्ठ नागरिक महिला लहान मुले यांना रस्त्यावरून जाता येता खूप त्रास होत आहे. याबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी स्थनिक ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांचेकडे या रस्त्याच्या डागडुजीच्या दुरुस्तीच्या मागणी केली होती. तसेच स्थानिक आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेकडे सुद्धा या रस्त्याबाबत येथील नागरिकांनी आपली कैफियत मांडली होती.परंतु सर्वांनीच येथील नागरिकांच्या या महत्वाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचे बोलले जात आहे. खारेपाटण कोष्टयेवाडी येथील रस्ता स्थनिक आमदार यांनी मंजूर केला असल्याचे सांगितले जाते.तर कधी जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री यांनी मंजूर केला असल्याचे सांगितले जाते.मात्र शासनाच्या व राजकर्त्यांच्या पोकळ आश्वासनाला कंटाळून अखेर खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील युवक युवती व नागरीक यांनी एकत्र येत खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील खराब झालेला रस्ता श्रमदानातून माती टाकून पूर्ण केला. यावेळी उत्तम रोडी, सचिन निग्रे,संतोष लोकरे,साधना धुमाळे,प्रविना निग्रे,योगेश कांबळी,बाळ्या लोकरे,जीवन पोयेकर राजू रोडी,दीपक कांबळी, ज्योतिराम लोकरे,चंदू झगडे,सुमित रोडी शेखर निग्रे, व वाडीतील इतर नागरिकांनी श्रमदानात सहभाग घेऊन मेहनत घेतली. खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील रस्ता सन २०२१ पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करून पूर्ण करून न दिल्यास यापुढे कुठल्याही राजकीय पक्ष्याच्या लोकप्रतिनिधी नेत्यांना मतदान करायचे की नाही ? याचा विचार करावा लागेल. असा निर्वाणीचा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला आहे.