सावंतवाडी /-
तौक्ते वादळ आणि पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या दुकानदार व पोल्ट्री व्यवसायिकांना शासनाकडून प्रत्येकी पन्नास हजारांची मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर अन्य नुकसानीपोटी अडीच कोटीचे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. ही कौतुकाची बाब आहे. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील वैद्यकीय २ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. श्री केसरकर यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यात तौक्ते वादळ व पूर परिस्थितीत गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची काही रक्कम अद्याप पर्यंत संबंधित नुकसानग्रस्तांना देण्यात आली नव्हती. ती तात्काळ देण्यात यावी, यासाठी आपण प्रांताधिकारी यांची आपण आज भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी दिवाळीपूर्वी संबंधितांना तात्काळ भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आपण केली आहे. त्यात बांदा, विलवडे, इन्सुली, माडखोल आदि दुकानांचा समावेश आहे. काही दुकानदार भाडेकरू आहेत. त्यामुळे त्यांच्यात व मालकात भरपाई वरून मतमतांतरे होती. त्यामुळे संबंधितांना भरपाई देण्यात काही अडचणी येत होत्या. मात्र तशा प्रकारचे कागद पूर्ण करून येत्या चार दिवसात ही भरपाई देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले, कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व अन्य कर्मचाऱ्यांनी भरीव काम केले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा आकडा जिल्ह्यात अतिशय कमी झाला आहे, याचे सर्व श्रेय त्यांना दिले पाहिजे, येणाऱ्या काळात पुन्हा कोरोनाचा कहर निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील लोकांनी काळजी घ्यावी, आकडा कमी झाला म्हणून बेफिकीरपणा काढावा, असेही ते म्हणाले.