कणकवली ./-
कोल्हापूरहून गोव्याला जात असलेली इनोव्हा व गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर ही दोन्ही वाहने परस्परांना धडकली. महामार्गावरील येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर रविवारी सकाळी ९ वा. सुमारास झालेल्या या अपघातात इनोव्हामधील सातही प्रवासी जखमी झाले. गडनदी पुलानजीक चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी तेथे वाहने एकाच लेनवर येतात. त्याच कारणास्तव हा अपघात घडला. सुदैवाने इनोव्हामधील एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात कार्तिक अशोक खोत (१२), दत्तात्रय आनंदा खोत (४०), बाबुराव शामराव खाटकर (५३), चैतन्य दत्तात्रय खोत (१२), चेताली दत्तात्रय खोत (१४), मनिषा दत्तात्रय खोत (३३, सर्व रा. बाजारभोगवत, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), चालक प्रदीप दिगंबर पोवार (३४, करवीर- कोल्हापूर) हे जखमी झाले. अपघातानंतर नागरीक, महामार्ग विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.